नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे
भारतीय संस्कृतीत होळी सणाला अन्यन महत्व आहे. म्हणून होळी साजरी करा. आनंद घ्या, मात्र पाण्याचा अपव्यय टाळा, होळी सणाला प्रत्येक वर्षी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या साठा कमी होवून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसून येत असल्या कारणाने कोरडी होळी खेळा. एक दिवसाच्या आनंदासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवू नका. शेती व जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपणही त्याच समाजाचा भाग आहोत, याचे भान असू द्या, सुक्या रंगांची कोरडी होळी खेळा असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय सदस्य भवरलाल जैन यांनी केले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बदलत्या काळानुसार होळी व धुलीवंदन साजरे करतांना पर्यावरण व निसर्गाचे संतुलन जोपासने अत्यंत गरजेचे आहे. सद्यस्थितीत वाढते प्रदूषण सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे होळी हा सण साजरा करतांना पर्यावरणाशी निगडित असावा जेणेकरून निसर्गाला इजा पोहोचणार नाही. कारण होळी या सणाला लाकुड, पाणी यांचा वापर जास्त होतो आणि या दोन्ही गोष्टी पर्यावरणाशी निगडीत आहेत. तसेच होळीच्या दिवशी केमिकल युक्त रंगाचा वापरामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असते. म्हणून पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. याचा परिणाम शेतकऱ्यांना जास्त भोगावा लागतो. म्हणून होळी सणाच्या आनंद पर्वावर आपण कोरडी होळी खेळण्याचा संकल्प करू या असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय सदस्य भवरलाल जैन यांनी केले आहे.
0 Comments