Header Ads Widget


संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून विविध कामांचे प्रस्ताव सादर करावेत; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या सूचना..


नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत. 


ते आज नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासह रनाळा, मांडळ, खोंडामळी मंडळातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठी संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई निवारण्याच्या कामासह विहीर अधिग्रहण, हातपंप, विहीर खोलीकरण, नदी,नाले, तलावाचे गाळ काढणे, नवीन हातपंप बसविणे, हातपंप दुरुस्ती तसेच रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या पाणंद रस्ते, घरकुल तसेच विविध योजनांची कामांच्या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने त्वरीत सादर करावा. अशा प्राप्त प्रस्तावाला यंत्रणेने त्वरीत मंजूरी द्यावी. ज्या गावांना पाणीटंचाई जाणवणार आहे अशा गावांनी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी  विद्युत विभागाने सुरळीत विद्युत पुरवठा करावा. लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन पाणी टंचाईसाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करून निर्णय घ्यावा.


पाणी पुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्या जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा. पर्यावरणांचा समतोल साधण्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा,गाव तसेच गावाच्या पडीक जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्षारोपण करावे. रोहयोतंर्गत विविध योजनांची सांगड घालून विविध योजना राबविण्यात येत आहे त्याचा आराखडा तयार करावा. 


कुठलाही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाने सर्वासाठी घरे योजना राबविण्यात येत असून ज्या कुटूंबाचे ‘ड’ यादीत नाव नाही अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार असल्याने यासाठी नागरिकांनी अर्ज सादर करावेत.  ग्रामसेवकांनी गाव, वाड्या, पाडे, अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राना जोडणाऱ्या कच्चे व नवीन रस्त्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जेणे करुन त्यांना त्वरीत मंजूरी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|