साक्री प्रतिनिधी /अकिल शहा
पर्यावरणाविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात युवा संशोधकाऺनी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी शाश्वत पर्यावरण संवर्धन पद्धतींबद्दल ज्ञान आत्मसात करून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या विषयांची एकत्रित संशोधनात्मक सांगड घालून वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू प्रा. पी.पी माहुलीकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने " शाश्वत पर्यावरणासाठी प्रगती: रासायनिक, भौतिक आणि जैविक दृष्टिकोन " या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. डी एल तोरवणे,प्रमुख अतिथी म्हणून डॉ एन जी देशपांडे, डॉ अनिल गोरे,रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ गुणवंत सोनवणे,सदस्य डॉ जे यु पाटील,कबचौ उमवी जळगाव चे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील प्रसंगी उपस्थित होते.
प्रा. माहुलीकर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले शासकीय पातळीवर पूर्वीप्रमाणे संशोधनासाठी अनुदान मिळत नसल्यामुळे तरुण संशोधकांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी होत चालले आहे. शासनाकडून जास्तीत जास्त संशोधन पर अनुदान मिळाले तर नाविन्यपूर्ण असे शाश्वत संशोधन तरुणांना करता येईल. या परिषदेत प्राध्यापक विद्यार्थी संशोधकांबरोबर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ही जमेची बाजू आहे. या विद्यार्थ्यांना परिषदेच्या माध्यमातून समाज उपयोगी संशोधन कसे करावे याची माहिती मिळाली तसेच संशोधन करण्यासाठी चालना व आत्मविश्वास मिळाला.
परिषदेत डॉ एन जी देशपांडे,डॉ अनिल गोरे, डॉ आर डी पाटील ,डॉ विकास गीते यांनी निमंत्रक संशोधक म्हणून आपले विचार मांडले. सदर कार्यशाळेत 92 संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गातील 23 विद्यार्थी अशा एकूण 115 व्यक्तीने आपला सहभाग नोंदवला. सदर कार्यशाळेत ६ संशोधक विद्यार्थ्यांनी मौखिक संशोधन निबंध सादर तसेच ४४ संशोधकांनी पोस्टर स्वरूपात आपले संशोधन सादर केले.मौखिक सादरीकरणात उका तरसाडीया विद्यापीठ बारडोली यांनी प्रथम क्रमांक, तर चोपडा येथील मयूर पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.पोस्टर सादरीकरणात तळोदा येथील कुणाल साळी प्रथम, आयआयटी सुरत येथील हरीपाल दयाल द्वितीय तर चांदवड येथील मनोज मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर शोधनिबंधांचे परीक्षण प्राचार्य डॉ पी एस गिरासे, डॉ संजय भदाणे, डॉ जगदीश पाटील,डॉ डी व्ही सोनवणे यांनी केले. सदर समारोप समारंभाचे संचलन डॉ अनुप मोरे यांनी केले व आभार संदीप कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे संयोजक डॉ दीपक नगराळे, सचिव डॉ प्रीतम तोरवणे,समन्वयक प्रा दिनेश खैरनार, प्रा. मुकेश वळवी, प्रा.सुरेंद्र मगर, प्रा संदीप कदम व विविध समितीतील प्राध्यापक सदस्य तसेच शिक्षकेतर बांधव आदींनी परिश्रम घेतले.सदर परिषदेला विज्ञान शाखेतील संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments