Header Ads Widget


नंदुरबार तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील 7 जण 2 वर्षांसाठी हद्दपार...सर्व जणांना 48 तासांच्या आत जिल्हयाबाहेर जाण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश...

नंदुरबार /प्रतिनिधी

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक  राहावा याकरीता पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी गुन्हेगारी टोळीतील 7 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेले सर्व जण नंदुरबार तालुक्यातील आहेत.

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे करणार्‍या इसमांची माहिती घेतली. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला. नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत श्री.पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या टोळीतील 07 इसमांविरुध्द् मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून एक टोळीस हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. सदर हद्दपार प्रस्तावाचा श्री.पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावाची छाननी केली. तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून 07 इसमांना 02 वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.हद्दपार करण्यात आलेल्या इसमांमध्ये अर्जुन भिला पवार (वय-24, रा.चाकळे ता.जि.नंदुरबार), सागर शिवनाथ पाडवी (वय-19, रा.चाकळे ता.जि.नंदुरबार), लखन बापू भिल (वय-22, रा. शनिमांडळ), ज्ञानेश्वर वसंत मोरे (वय19, वर्षे रा.शनिमांडळ ता.जि. नंदुरबार), न्हानभाऊ भगवान भिल (वय-25, रा.शनिमांडळ ता.जि. नंदुरबार), किरण मंगलसिंग भिल (वय25,रा.तिलाली ता.जि. नंदुरबार), विपुल सुरेश कोळी (वय-23, रा.तिलाली ता.जि.नंदुरबार) यांचा समावेश आहे.

हद्दपार आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येत असून हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाच्या आंत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच 7 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments

|