![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2023/01/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-1-750x375.jpg)
मुंबई/LivenationNews Bulletin
राज्यातील वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करणे, उर्दू अकादमीमार्फत मुशायऱ्याचे आयोजन करणे याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सय्यद शहजादी यांनी दिली.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ८ जानेवारीपासून आजपर्यंत त्या राज्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध धार्मिक प्रमुखांशी चर्चा केली, तसेच राज्य शासनाचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव यांच्यासमवेत आढावा बैठका घेण्यात आल्या. मुंबईत अल्पसंख्याक समाजाच्या काही कार्यक्रमांना त्या उपस्थित राहिल्या. या कार्यवाहीसंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत स्मार्ट वर्ग खोल्या, शौचालये, सदभाव मंडप हॉस्टेल्स इत्यादी योजना आहेत. केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या दौऱ्यामध्ये या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राज्यात अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी २४ वसतिगृहे असून ८ वसतिगृहांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यासाठी २०२१-२२ मध्ये १७.७३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आल्याचे कुमारी सय्यद शहजादी यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाच्या जागांवरील अतिक्रमणे काढणे, बोर्डातील कामकाजासाठी मनुष्यबळाची उपलब्धता करणे, रिक्त जागांची भरती याअनुषंगानेही दौऱ्यामध्ये आढावा घेण्यात आला. मशीद, मदरसे, अशुरखाना तसेच कब्रस्तान यांच्या नोंदणीसाठी व्यापक प्रयत्न करावेत, जेणेकरुन शासनाच्या विविध सुविधा त्यांना मिळू शकतील, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ख्रिश्चन समाजासह विविध अल्पसंख्याक समूहाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. उर्दू अकादमीच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला असून मागील काही वर्षापासून कोरोना संकटामुळे बंद असलेला मुशायऱ्याचा कार्यक्रम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे दरवर्षीप्रमाणे मुशायऱ्याचा कार्यक्रम पुन्हा सुरु करावा, तसेच त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे कुमारी सय्यद शहजादी यांनी सांगितले.
0 Comments